भारतीय भाषा परिवारात संस्कृतचे स्थान मातेचे तर इतर
सर्व भाषेचे स्थान भगिनींचे आहे. यात हिंदी सर्व भारतीय भाषेची मोठी बहिण
आहे. भारतीय जनगणना 1991 न्वये हिंदी भाषिकांची संख्या एकूण भारतीय
लोकसंख्येच्या 40.20 इतकी आहे. केंद्रीय भारतीय भाषा संस्था म्हैसूर
यांच्या आकडेवारीनुसार व जनगणना 1991 मधील सर्वेक्षणानुसार इतर भारतीय
भाषेचे टक्केवारी मराठी-7.50, बंगाली-8.30,तेलुगु- 7.90, तमील-6.30,
कन्नड-3.90, मल्याळी- 3.60, पंजाबी- 2.80, उडिया- 3.30, गुजराती- 4.90,
उर्दू-5.20, असामी-1.40 इतकी आहे. भारतीय घटनेतील आठव्या परिच्छेदात एकूण
22 राष्ट्रीय भाषेचा सामावेश केलेला आहे. याशिवाय इतर 844 वेगवेगळ्या बोली
भाषा भारतात अस्तित्वात आहेत.
विकीपीडिया ज्ञानकोषात
सी.एम.बी.ब्रान यांच्या व्याखेनुसार कोणत्याही देशाची राष्ट्रभाषा निश्चित
करण्याकरीता खास चार गुणांचा सामावेश असणे आवश्यक आहे. ते गुण म्हणजे- 1)
ती भाषा त्या देशाची प्रादेशिक भाषा अथवा विशिष्ट प्रदेशातील लोकांची भाषा
असावी 2) क्षेत्रीय भाषा जी त्या देशातील विशिष्ट क्षेत्रात उत्तर,दक्षिण
वगैरे भागातील असावी 3) सर्वसाधारण संपुर्ण देशात बोलली व समजली जाणारी
भाषा किंवा जनसमूहाची भाषा 4) केंद्रीय भाषा जी त्या देशातील सरकारी
कामकाजाकरीता एक राष्ट्रीय ओळख या नात्याने वापरली जाते. शेवटच्या दोन गुण
विशेषांमुळे बहुतेक भाषा या त्या देशाची वास्तविक अथवा कायदेशीर
राष्ट्रीय भाषा ठरते.
15 ऑगस्ट 1947 पूर्वी हिंदीला राष्ट्रभाषा
म्हणूनच संबोधले जात होते. स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांनी
सत्य, अहिंसा, खादी, असहकार या बरोबर हिंदी भाषेचा वापर राष्ट्रीय भावना
संपूर्ण देशात जागृत करण्यासाठी केला होता. कलकत्ता येथील कांग्रेस
अधिवेशनात त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या इंग्रेजी भाषेबद्दल स्तूती
केली परंतु त्यांनी टिळकांना सल्ला दिला की येथून पुढे काग्रेस च्या
मंचावर फक्त हिंदी भाषेत भाषण दयावे ज्यामुळे सर्व सामान्य कांग्रेस
कार्यकर्ता अधिक सक्रिय होऊ शकेल.
महात्मा गांधी हिंदी आंदोलनाचे
प्रमुख नेते होते. त्यांची मातृभाषा गुजराती होती. देशाच्या अखंडते करीता व
देशाला एक सूत्रात बांधणारी राष्ट्रभाषा हिंदी हीच सर्वश्रेष्ठ भाषा आहे
हे त्यांनी सर्वच भारतीयांना पटवुन दिले. 20 आक्टोबंर,1917 रोजी त्यांनी
भडोच येथे द्वितीय गुजरात शिक्षण संमेलनात राष्ट्रभाषा संकल्पना मांडली. ते
म्हणतात-
1. ती भाषा सरकारी नोकरी करीता सहज समजणारी पाहिजे.
2. त्या भाषेमुळे भारतातील अंर्तगत धार्मिक,आर्थिक, व राजकिय कामकाज शक्य व्हावे.
3. ही भाषा देशातील बहुसंख्य लोग बोलणारी असावी.
4. ही भाषा राष्ट्राकरीता सोपी असावी.
5. या भाषेचा विचार करताना क्षणिक व तात्पुरता विचार केला जाऊ नये.
या पंचसूत्राचा विचार करता त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषा का संबोधले हे ध्यानात येऊ शकते.
भारत
सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांती वर्मा द्वारा लिखित हिंदी और
उसकी उपभाषाएं पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यांनी सरकारी आकडेवारीच्या
आधारे हिंदी भाषेचा सर्वेक्षण रिपोर्ट सादर केलेला आहे. द केम्ब्रिज
इनसाइक्लोपीडिया आफ लैंग्वेज अनुसार प्रथम वीस भाषेत हिंदीचा चौथा क्रमांक
तर तसेच लोकसंख्ये अनुसार हिंदीचा तिसरा क्रमांक आहे. परंतु यात बिहारी
बोलणा-या 6.5 करोड लोकांना जोडले तर मातृभाषा या नात्याने हिंदी जगात
तिस-या क्रमांकाची भाषा आहे. भारतात द्विभाषिक स्थिति मुळे अनेक प्रातांत
हिंदी ही दूसरी भाषा या नात्यांने प्रचारात आहे. महाराष्ट्रात मराठी
नंतर हिंदी समजणारे 86.17 लोक हिंदीचा उपयोग करतात. भारतीय भाषा परिवारात
हिंदी भाषा द्वितीय भाषा म्हणून मोठया प्रमाणात सर्वत्र वापरली जाते
कोलकोता
येथील कार्पोरेशन बँकेचे वरिष्ठ अधिकारी डॉ.जयंतीप्रसाद नौटियाल यांनी
हिंदी भाषेच्या प्रसारावर संशोधन करुन आपला प्रबंध सादर केलेला आहे.
त्यांच्या या प्रबंधात त्यांनी जागतिक आकडेवारीनुसार हे सिध्द केले आहे की
हिंदी ही जगातील प्रथम क्रमाकाची भाषा आहे.त्यांनी ही आकडेवारी वर्ड
अलमेनिक वरुन घेतली आहे. तसेच विविध देशातील दूतावासातील अनेक वरिष्ठ
सचिवांकडून त्यांनी आकडेवारी गोळा केली आहे. त्यांच्या आकडेवारीनुसार चीन
मध्ये अनेक बोली भाषा असुन त्यांचा सामावेश मंदारीन भाषेत केलेला आहे. चीन
मध्ये अनेक बोली भाषिक दुसरी बोलीभाषे पासुन अनभिज्ञ आहेत. हिंदी समजणारे
जगात एक अरब पेक्षा जास्त लोक आहेत जे जगातल्या अनेक देशात विभागले गेले
आहेत. जगातील भाषातज्ञ हिंदीतील खडीबोलीलाच हिंदी भाषा मानतात परंतु हिंदीत
अनेक बोली भाषा आहेत. उर्दूचे व्याकरण हिंदी भाषेवर आधारित आहे. ती शुध्द
भारतीय भाषा आहे ज्यात काही अरबी फारसी शब्द आहेत. हिंदी जाणणारे कोणीही
उर्दू भाषा सहजपणे समजू शकतात. पाकिस्तानात सिंधी,बलुची,अफगाणी या भाषा
आहेत परंतु फाळणीत पाकिस्तानात भारतीय मुसलमान आपली भारतीय भाषा उर्दू
तिकडे घेउन गेले. उर्दू राजकिय आश्रयामुळे तेथील स्थानिक भाषा नसुन सुध्दा
राष्ट्रीय भाषा होऊ शकली. हिंदी समजणारे या देशात 80 टक्के लोक आहेत.
इंग्रजी समजणारे फक्त 3 टक्के लोक आहेत. जगात इंग्रजीची टक्केवारी 4.85
इतकी आहे.
14 सप्टेंबर 1949 रोजी भारताने केंद्र
सरकारच्या सर्व प्रशासकिय कामकाजा करीता हिंदी भाषेचा स्वीकार राजभाषा या
नात्याने केला आहे. घटनेतील कलम ३४३ न्वये देवनागरी लिपित लिहीली जाणारी
हिंदी भाषा राजभाषा आहे. हिंदीच्या संदर्भात १९४८ रोजी चक्रवर्ती
राजगोपालाचारी यांनी भारतीय घटना सभेत नॅशनल लैंग्वेज (राष्ट्रभाषा) व
स्टेट लैंग्वेज (राजभाषा) शब्दांचा वापर केला. घटना समितीने स्टेट
लैंग्वेज करीता हिंदीत राजभाषा हा अनुवाद केला आहे. यावर काही विद्वानांनी
विरोध केलेला आहे.स्टेट लैंग्वेज ऐवजी ऑफिशियल लैंग्वेज हा शब्द स्वीकार
केला गेला. ऑफिशियल लैंग्वेजचा प्रयोग अर्थात हिंदीचा प्रयोग सरकारी
कामकाज,प्रशासन,लोकसभा व राज्यात विधान सभेत व न्याय पालिकेत स्वीकार्य
केला गेला आहे.
14 सप्टेबंर,1949 रोजी म्हणजे घटना अस्तित्वात
येण्याअगोदरच तत्कालीन प्रबुद्ध राजकिय नेत्यांनी हिंदीचा स्वीकार केला.
याच दिवशी भारतीय घटना सभेचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांचे समारोपाचे
भाषण झाले. त्यात त्यांनी हिंदी विषयी मार्गदर्शक चिंतन व्यक्त केले आहे.
ते म्हणतात की आमच्या देशाच्या इतिहासात आतापर्यंत कधीच एका भाषेला सरकार
दरबारी व प्रशासनात मान्यता मिळाली नाही. मला विश्वास आहे कि हिंदी भाषा
अन्य भारतीय भाषेतील चांगली ग्राह्य गोष्टी स्वीकारील ज्यामुळे तिची अधोगती
नाही तर विकासच होणार आहे. राजभाषा हिंदीच्या लोकसभेतील त्या चर्चेमुळे
अनेक प्रांतात फूट पडू शकली असती परंतु तत्कालीन नेत्यांनी संयमाने व
अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकसभा जिंकली. एका केंद्रीय भाषेमुळे आपल्यातील अंतर
दूर होईल. आमचे संबंध घनिष्ट होतील कारण आपली परंपरा,संस्कृती व सभ्यता एक
आहे.
भारत सरकारच्या प्रकाशन विभागाने डॉ.विमलेश कांति वर्मा
द्वारा संपादित लोकसभेतील भाषणांच्या संकलीत कागदपत्रांवर आधारीत हिंदी
राष्ट्रभाषा से राजभाषा तक प्रकाशित केले आहे.यात सर्वच नेत्यांच्या
भाषणांचा वृत्तांत आपणास वाचता येईल.
घटनेतील कलम ३५१
अत्यंत महत्वपूर्ण आहे. यात केंद्र सरकारने राजभाषा हिंदी शब्दाचा वापर न
करता हिंदी शब्दाचा वापर केला आहे. या कलमात स्पष्ट केले आहे की भारतातील
एकजीव संस्कृतीच्या सर्वच अभिव्यक्तींचा माध्यम या नात्याने हिंदीचा विकास
करावा. त्या भाषेचा आत्मा न बदलता या भाषेत हिंदुस्तानी (जी भाषा म.गांधी
यांना अभिप्रेत होती ज्यात उर्दू व संस्कृत भाषेचा समान वापर केलेला आहे) व
घटनेतील आठव्या परिच्छेदातील सर्व भारतीय भाषांच्या ( ज्या आज मितीला २२
आहेत) प्रचलित शब्दांना आत्मसात केले जावे. अन्य भारतीय भाषेचे रुप,शैली,व
पदावलीचे अनुकरण करुन मुख्यत संस्कृत व अन्य सर्व भाषेचे ( यात जगातील
सर्व प्रचलित भाषा ज्यात इंग्रजी सुध्दा अंतर्भुत असेल) शब्द ग्रहण करुन
हिंदी भाषा समृद्ध करावी. यामुळे हे स्पष्ट होते कि भारतात हिंदी ही भाषा
कोणत्याही विशेष प्रदेशाची मक्तेदारी नाही. ती जशी महाराष्ट्राची आहे तशी
ती तमीळ जनतेचेची सुध्दा आहे.
स्वातंत्र्य चळवळीत हिंदीचा उल्लेख हा
तत्कालीन सर्वच राजकिय नेत्यांनी राष्ट्रभाषा हाच केला आहे. महात्मा
गांधी यांच्या प्रेरणेने वर्धा येथे राष्ट्रभाषा प्रचार समितिची स्थापना
केली गेली. आज वर्धा येथे केंद्र सरकारने जगातील पहिले महात्मा गांधी
आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ स्थापन केले आहे. या विद्यापीठाचे स्थलातंर
काही उत्तरेतील प्राध्यापक वर्ग दिल्ली करणार होते परंतु राष्ट्रभाषा
प्रचार समितिच्या प्रयत्ना मुळे ते तहकुब झाले. मा.मधुकर राव चौधरी यांच्या
कार्यामुळे महाराष्ट्राच्या भूमिवर केंद्र सरकारचा हा आंतरराष्ट्रीय
प्रकल्प उभा राहीला आहे. त्यांनी नागपुर येथे पहिले आंतराष्ट्रीय हिंदी
सम्मेलन 10 जानेवारी,1975 रोजी आयोजित केल्यामुळे आज जगात सर्वत्र व सर्व
दूतावासात 10 जानेवारी हा विश्व हिंदी दिवस पाळला जातो. 14 सप्टेबंर 1949
रोजी राजभाषा हिंदी स्वीकारल्या मुळे केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयात 14
सप्टेबंर हा हिंदी दिवस पाळला जातो. याचे श्रेय सुध्दा वर्धा येथील
राष्ट्रभाषा प्रचार समितीलाच आहे.
आज मनोरंजनाच्या क्षेत्रात
हिंदीला तोड नाही. मुंबईच्या बॉलीवुड मधुन हिंदी वगळली तर व्यवसाय किती
होईल हे गणित तपासले पाहिजे. गुजराती कलाकार परेश रावल,संजीव कुमार, बंगाली
कलाकार शर्मिला टागोर,मिथुन चक्रवर्ती,मराठी कलाकार नाना पाटेकर, लता,आशा
या विविध प्रांतातील कलाकारांनी हिंदी चित्रपटात आपला प्रभाव राष्ट्रीय
स्तरावर पोहचविला आहे. राजकारण करण्याकरीता प्रांतीय अस्मिता ठीक आहे
परंतु जर देशाचा विचार करणार असाल तर हिंदीला पर्याय नाही. अमेरीकेवर दहशती
हल्ला झाल्यानंतर राष्ट्रीय सूरक्षा योजने अंतर्गत तेथे अरबी,चीनी बरोबरच
आता हिंदी करीता सुद्धा करोडों डॉलरच्या भाषा शिक्षणाच्या योजना अस्तित्वात
आल्या आहेत. पुणे येथील सी-डॅक या संस्थेने जिस्ट व आर्टफेशियल इंटलिजंस
अंतर्गत हिंदी व अन्य भाषा विकास योजना हाती घेतल्यामुळे देशात माहिती
तंत्रज्ञानात भारतीय भाषेचा मार्ग सुकर झाला. या संस्थेने हिंदी भाषा
शिकण्याकरीता लिला योजना यशस्वी केली आहे. इंग्रजी माध्यमातुन हिंदी
शिकवणारे हे सॉफ्टवेयर जगात प्रसिद्ध आहे. याच संस्थेने यांत्रिक अनुवाद
करणारे इंग्रजी-हिंदी सॉफ्टवेयर मंत्रा (मशीन असिस्टेड ट्रांसलेशन) हे
अमेरिकन सरकारने जागतिक वारसा या अंतर्गत संग्रहित केले आहे.
हिंदी
संमेलन,परिसंवाद,कार्यशाळा याकरीता जेव्हा कधी उत्तर भारतात जावे लागते
तेव्हा तेथील लोक महाराष्ट्राच्या विकासा बध्दल प्रशंसा व्यक्त करतात.
राष्ट्रभाषा हिंदी प्रचारातील महाराष्ट्राचे योगदान ते मान्य करतात.
जाज्वल्य राष्ट्रभक्ती साठी महाराष्ट्रातील विनायक दामोदर सावरकर,
लोकमान्य टिळक, विनोबा भावे, महात्मा फुले, नामदार गोपाळ कृष्ण गोखले,
आगरकर, कर्वे यांचा आदराने उल्लेख केला जातो. 1857 चा उठाव असो किंवा 1942
ची चले जाव चळवळ असो या सर्वच राष्ट्रीय आंदोलनात महाराष्ट्राचे नांव
अग्रभागी आहे. राष्ट्रीय आंदोलनातील महाराष्ट्राचे नांव सर्वच भारतात
आदराने घेतले जाते.
हिंदीत रोजगाराच्या अनेक वाटा आहेत. यात अनुवाद,
पत्रकारीता, दूरदर्शन,चित्रपट,जाहिरात,विपणन,व्यापार,पर्यटन,धार्मिक
संस्था इ. अनेक क्षेत्रात महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.
परंतु बेरोजगार युवकांची माथी हिंदी विरोधात पेटवून राष्ट्रीय ऐक्याला तडा
जाणारी वक्तव्ये टाळावीत. पुरोगामी महाराष्ट्रात आज जर हिंदीला विरोध
होणार असेल तर या सारखे दुसरे दुर्दैव नाही. घटनेत हिंदी भाषेला राजभाषेचा
दर्जा मिळाला आहे. परंतु राष्ट्रभाषा हा शब्द कोठेच नाही. जनतेत गैरसमज
पसरविणे सोपे आहे परंतु प्रामाणिकपणे देशाची राष्ट्रभाषा ठरविणे खुपच कठीण
काम आहे. आज अमेरिकेत सुद्धा इंग्रजी राष्टभाषा होण्यासाठी सिनेटच्या
मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. याचा अर्थ इंग्रजी तेथे महत्वाची भाषा नाही असा
होत नाही. लोकशाहीत सर्वसम्मती प्राप्त होणे आवश्यक असते. जगात आज अनेक
प्रमुख भाषा राष्ट्रभाषा घोषित होण्यासाठी संघर्षरत आहेत.